शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी व्यथित असलेली माणसे येत्या १९ मार्चला एक दिवसासाठी अन्नत्याग करतील. हा उपवास कुठल्याही देवासाठी नाही, तो नवसाचाही नाही. हातपाय सुखाचे ठेव, ही प्रार्थनाही त्यात नाही. ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या भुकेच्या तळाशी पोहचण्यासाठी हा आत्मकेलश करून अन्नत्याग आहे.
३४ वर्षापूर्वी १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चीलगव्हाण या खेड्यातील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या केली. त्या दिवशी सकाळी साहेबराव पत्नी मालती आणि चार मुलांना घेऊन विनोबांच्या पवनार आश्रमात गेले, परत आले, रात्री जेवणात विष कालवले आणि मृत्यूला कवटाळले. ही महाराष्ट्रातील जाहीर झालेली पहिली शेतकरी संपूर्ण कुटुंबाचीआत्महत्या. नंतर साहेबरावांसारख्या असंख्य शेतकऱ्यांनी मरण पत्करले. या मरणयातना आजूनही संपलेल्या नाहीत त्या संपाव्यात यासाठी सुरु असलेल्या तगमगीतील एक म्हणजे हा उपवास.
साहेबरावांच्या गावात त्या दिवशी सुतक पाळले जाईल. कुणाच्याही घरात चूल पेटणार नाही. सातेफळचे गावकरी घरासमोर काळ्या ठिपक्यांची रांगोळी काढतील. शेतकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते अमर हबीब हे गेली अनेक दिवस यासंदर्भात आपली भूमिका मांडत आहे. शेतकऱ्यांचे खरं दुखणे हे कायद्यात आहे. यासाठी किसानपुत्र आंदोलन लढा देत आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांनी जो शिकून शहरात उदरनिर्वाह करत आहे. या किसानपुत्रांनी शेतकरी आत्महत्याप्रति अन्नत्याग करावा. गावातील भूमीपुत्रांनी आपल्या गावात उपवास करावा, अशी अपेक्षा किसानपुत्र आंदोलनाची आहे.
देवाच्या नावाने आज पर्यत प्रत्येकाने खूप उपवास केले आता एक दिवस अन्नदात्यासाठी आपण उपवास करून चिंतन केले पाहिजे की, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आपण नेमक कमी कुठे पडतो आहे?
अन्नत्याग करून काय साध्य होईल? फार काही होणार नाही. पण, “माझा बाप मरत असताना मी सुद्धा एक दिवस उपाशी होतो” हा दिलासा आपल्या मनात राहील. ज्या कारणांमुळे आपला अन्नदाता स्वताला संपवतो त्या भुकेचा शोध रक्ताच्या नात्यांनी नाही तर कुणी घ्यावी? शेतकऱ्यांच्या विधवांचा टाहो ज्यांना अजूनही जागवत नाही, त्या पुढार्यांना आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्याची देखील सहवेदना आणि जाणीव नाही. धनधनदांडग्यांच्या कळपात बळीराजाला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान रचणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्यादिवशी आत्मचिंतन करावे आणि अन्नत्याग करून सहभागी व्हावे. शेतकरी आत्महत्या ही सगळ्यात मोठी मनाला क्लेश देणारी घटना रोज होत असते. ह्या देशातील शेतकरी जगला पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांनी सर्वांनी अन्नत्याग करून शेतकऱ्यांच्या संघर्षात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे बळ आपल्या दुबळ्या मनाला लाभावे. यासाठी तो एक दिवसाचा उपवास आहे.
शेतकरी आपल्या घामाचा भाव मागत असतो पण ही व्यवस्था बांडगुळाच्या हातात असल्याने त्यांचे मरण कठीण झाले आहे. जाचक शेतकरीविरोधी कायद्याने त्याच्या पायात बेड्या टाकल्या गेल्या व त्यांच्यावर न्यायबंदी लादली हे सर्व कोणाला माहिती करून घ्याचे नाही अशी एकूण परीस्थिती आहे. अन्नत्याग हे केवळ उपवासापुरते मर्यादित नाही. शेतमालाचे भाव व कर्जमाफीत घुटमळत असलेल्या शेतकरी चळवळीला त्यातून बाहेर काढण्यासाठी हा आत्मक्लेश आहे. शेतकऱ्यांची मुले आता शहरात राहतात. त्यांनी पुन्हा परत जावे अशी अपेक्षा नाहीच पण शहरात राहून आपल्याला रोजच अन्न देणाऱ्या आपल्या शेतकऱ्याचे आत्महत्येचा शोध तर त्यांना घेता येईल? पुढच्या काळात शेतकरी आंदोलनाची दिशा तोच ठरवणार आहे.
साहेबराब करपे यांची आत्महत्या कोण्या एकाची नाही तर संपूर्ण कुटुंबाची होती. आत्महत्येपूर्वी साहेबराव करपे मुलाबाळांना घेऊन बसले, त्या सर्वांनी राष्ट्रसंतांचे ‘येऊ दे आता तरी गुरुमाऊली, या आयुष्याची दोरी कमी जाहली’ हे भजन म्हटले, ही आर्तता आजूनही गावशिवारात घुमत आहे. ती अस्तंगत व्हावी, यासाठी हा उपवास आहे. या पोशिद्यासाठी तो तुम्हालाही करता आला तर बघा…!
मयुर बाळकृष्ण बागुल,
किसानपुत्र आंदोलन, पुणे
9096210669