मा. अध्यक्ष / सचिव,
संघटना/ मंडळ/ संस्था/ पक्ष/
विषय- 19 मार्च रोजी होणाऱ्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ अभियानात सहभागी होण्या बाबत
माननीय महोदय,
आपणास हे माहीत आहेच की, 19 मार्च 1986 रोजी चिल-गव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. पती- पत्नी व चार लहान आणि शाळकरी मुले. ही पहिली शेतकऱयांची सामूहिक आत्महत्या मानली जाते. हादरवून टाकणारी ती घटना होती. येत्या 19 मार्चला त्यांचा स्मृतिदिन आहे.
2) या घटनेनंतर देशात सुमारे साडे तीन लाख शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. आजही दररोज सरासरी 40 ते 50 शेतकरी आत्महत्या करत आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होतात. संवेदनशील नागरिक म्हणून आपण याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. शेतकरी आत्महत्या कशा थांबतील यासाठी यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.
3) आपण शेतकऱ्याना अन्नदाता मानतो. तो सर्जक आहे.
आणि आज अन्नदाता संकटात आहे. त्याला आत्महत्या करणे भाग पडत आहे. शेतकऱयांची आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. सरकार विचार करेल तेंव्हा करेल, नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे असे आम्हाला वाटते.
4) अनेक संवेदनशील व्यक्ती 19 मार्च रोजी उपवास करून सहवेदना व्यक्त करतात. आपण आपल्या संघटना/ मंडळ/ संस्था/ पक्ष यांच्या वतीने 19 मार्चच्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग अभियानाला पाठिंबा द्यावा.
सर्व मतभेद बाजूला ठेवून शेतकऱयांच्या आत्महत्या विषयी आपली सहवेदना व्यक्त करावी, ही कळकळीची विनंती आहे.
आपणास विनंती आहे की,
१) 19 मार्च रोजी आपण व आपल्या सहकाऱयांनी एक दिवस अन्नत्याग करावा. उपवास करावा,
2) ठिकठिकाणी उपोषणाचे आयोजन करण्यात पुढाकार घ्यावा.
3) जेथे अन्य कोणी पुढाकार घेतला असेल तेथे उपोषाणाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, त्यास सहकार्य करावे, ही विनंती.
आपला पुढाकार, सहभाग व सहकार्य राहील अशी मला आशा आहे.
आपला
अमर हबीब
किसानपुत्र आंदोलन
8411909909