या साऱ्या पार्श्वभूमिवर किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन लोकशाहीकरणाच्या दृष्टीने व लोकांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक प्रभावी सुरुवात आहे असे वाटते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ज्यांना काही संवेदना आहेत त्यांनी १९ मार्चला आपल्याच घरी एक दिवस अन्नत्याग करावा असे हे आंदोलन आहे. हे असे आंदोलन आहे की ते आपण बाहेर कुठे न जाता आपल्याच घरात करावयाचे आहे. कोणावरही बळजबरी न करता आपली मानसिक तयारी आपणच करायची आहे. ना तर कुणी तुम्हाला आंदोलन केल्याबद्दल लाठीकाठी मारायला येईल, ना तर कुणाला अटक करण्याची संधि मिळेल. हे सगळे साधत लोकांच्या मनात रस्त्यावरच्या आंदोलनापेक्षा सक्षम अशी जनजागृती होऊ शकेल. आजवरची सारी आंदोलने पहाता एक वेगळ्या घाटणीचे हे आंदोलन असून त्यात म. गांधीच्या लोकांच्या भावनांना हात घालणे व स्वयंस्फूर्तीने सामील होण्यास बाध्य करण्याच्या प्रयत्नांची झलक दिसून येते. आपल्या सद्य राजकीय व्यवस्थेत आंदोलनांच्या माध्यमातून आपली ताकद, उपद्रवक्षमता दाखवण्याचा जो काही अश्लाघ्य परिपाठ पडला आहे त्या पार्श्वभूमिवर आपली भूमिका मांडण्याच्या प्रयत्नांना एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारे हे आंदोलन असल्याने, प्रथम सहभागाची निश्चिती व नंतर अपेक्षित वर्तनाचा सर्वंकष विचार असलेले हे आंदोलन एक नवी सुरुवात आहे असे वाटते. हे आंदोलन आज जरी प्रतिकात्मक वाटत असले तरी संघटनात्मक पातळीवर एका मोठ्या समूहाला परिवर्तनाला आवश्यक असणाऱ्या वर्तन प्रक्रियेत रुपांतर करु शकते याची क्षमता बाळगणारे आहे असे वाटते. एका मोठ्या समूहाच्या व्यक्त न होऊ शकणाऱ्या भावना व्यक्त करतांनाच त्यांच्यात एक विचार रुजवत नव्या दिशेने जाणाऱ्या हे आंदोलन लोकशाहीप्रेमी जनतेला लोकशाही मार्गाने आपल्या भावना सुरक्षितपणे व्यक्त करण्यात यशस्वी ठरावे.
डॉ. गिरधर पाटील
९४२२२६३६८९
nasikgreen@gmail.com
(6 मार्च 20 रोजी प्रकाशित झालेल्या लेखातील उतारा)