© नितीन राठोड, उस्मानाबाद-पुणे
“मला सहकारी हवे आहेत. मला अनुयायींची आवश्यकता वाटत नाही, मी अशा स्वयंप्रकाशित सूर्यांच्या शोधात आहे. ज्यांना स्वतःचा प्रकाश आहे. पृथ्वीच्या भोवताली घिरट्या मारणाऱ्या चंद्राची मला आवश्यकता नाही,’ हे ऐकताच मला हा माणूस वेगळा वाटायला लागतो.
आमची पहिली भेट लातूर मधील संत साहित्य संमेलनात झाली. मी येणार आहे, असे सांगितले होते. मी भाषण झाल्यानंतर भेटायला गेलो. तेथे गप्पा झाल्या. अशी आमची पहिली भेट.
केस सगळे पांढरेशुभ्र झालेले. त्याला कधी काळा रंग दिला असेल असे वाटत नाही, तितकंच निर्मळ स्वच्छ हास्य. बोलताना मराठीतले सगळे उच्चार शुद्ध. उत्तम कवी, कथाकार, पत्रकार म्हणजे अमर हबीब! ते आंबेजोगाईत राहतात.
अमर हबीब जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा आमच्या बोलण्यात जयप्रकाश नारायण, पहिली घटना दुरुस्ती, आणीबाणी व त्यांचा अठरा महिन्याचा आणीबाणीतला तुरुंगवास, शरद जोशी व दिल्लीतील पत्रकारिता, अमृता प्रीतम आणि तिची प्रेम कथा, मराठवाड्यातील नामांतराचा लढा, शेतकरी संघटना आणि किसानपुत्र आंदोलना पर्यंतचा त्यांचा प्रवास हे सगळे विषय येतात. त्यांचा हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे.
हा माणूस एकाच वेळी आंदोलक आहे, कवी, कथाकार, पत्रकार आहे. बालभारतीच्या अभ्यास मंडळावर काम करतो, शेतकरी विरोधी कायद्याच्या संदर्भात देशभरात फिरतो, याही वयात रोज प्रवास करतो, तोही महामंडळाच्या बस मध्ये!
त्यांचा गांधी हा अत्यंत आवडीचा विषय आहे. गांधीहत्या मुळे देशातील सर्वाधिक संख्येने राहणाऱ्या शेतकऱ्याचे नुकसान कसे झाले आहे, हा एक त्यांचा महत्त्वाचा विषय. गांधी यांनी निळीच्या सक्तीच्या विरोधात केलेला लढा हा त्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण वाटतो. तो लढा शेतकरी स्वातंत्र्यासाठीचा उभा केलेला लढा होता असे त्यांना ठामपणे वाटते. आपल्या आंदोलनात ते गांधीला महत्त्वपूर्ण स्थान देतात. आजच्या आंदोलनाचे स्वरूप पाहून त्यांनी स्पष्ट सांगितले आहे, ‘आपले आंदोलन हे अहिंसक असेल. आपण गांधीच्या मार्गाने जाणार आहोत. तरुणांची माथी भडकावून त्यांना हिंसेसाठी परावृत्त करणे हे मला मान्य नाही.’
अमर हबीब जन्माने मुस्लिम पण त्यांची बायको आशा वाघमारे या ख्रिस्ती आहेत. याही परिस्थितीत या दोघांचा आंतरधर्मीय विवाह झाला. ते याला ‘मानवी विवाह’ म्हणतात. पुढे त्यांनी आपल्या मुलीचा सुद्धा प्रेम विवाह मान्य केला. जावई शीख आहे. ते म्हणतात, ‘मानवी विवाह’ व्हायला हवे. फक्त आपण माणूस म्हणून एकत्र यावे आणि धर्म-जाती याला बाजूला सारून एकत्र येऊन विवाह करायला हवेत.’ ते सांगतात की, त्यांच्या वडिलांनी असा आग्रह धरला होता ती त्यांच्या पत्नीने त्यांचा ख्रिस्ती धर्म सोडून इस्लाम कबूल करायला हवा पण त्यांनी कोणतीही सक्ती केली नाही. आजही त्यांची बायको ख्रिस्ती आहे.
त्यांची ‘ ईद’ नावाची कथा आहे. ती खूप प्रसिद्ध आहे. यात त्यांनी आपल्या आईला पडणारे कष्ट दाखवले आहेत. ईदच्या दिवशी पहाटेपासून काम करावे लागते तरीही ती याबाबतची कोणतीही तक्रार करीत नाही. एका ईदच्या दिवशी ती एक अंगठी देते. अंगठीचे त्यांना विलक्षण आकर्षण आहे. पुढे आई वारते पण जेव्हा ‘ईद’ येते व ती अंगठी पाहून लेखक आपल्या आईला आठवत राहतो. अशी त्यांची प्रसिद्ध कथा आहे….
मग काय? सध्या काय वाचता? असे विचारून मी काय वाचतो यावर ते नेहमीच चर्चा करतात. तुम्ही हे पुस्तक वाचले आहेत का? ही कथा वाचली आहे का? यांची कविता वाचली आहे का? आयन रॅड ही फार मोठी लेखिका आहे, ती आपली संघर्षकथा मांडते. तू ते वाचायला पाहिजे! माझ्या वाचनात ते खूप उशिरा आले. याची मला खंत आहे. म्हणून तुला म्हणतोय तू ह्या वयात वाचून घे. ती विचार कशी करते हे समजावून घे. तिचा प्रभाव शरद जोशींवर सुद्धा होता. त्यांनी ते वाचलं होतं. आणि आम्हाला सांगितलं होतं. आयन रँडचे मूळ लेखन इंग्रजी मध्ये होतं, पुढे मी त्याचे भाषांतर मिळवले आणि तेही वाचले.
विचार करणारा माणूस हा नेहमी व्यवस्थेला धक्का देत असतो आणि सगळ्यात धोकादायक काय असते, व्यवस्थेला स्वतंत्र विचार करणारे लोक नको असतात. तर त्यांना गुलाम आवडतात. स्वतंत्रपणे विचार करणारी माणसे व्यवस्थेला नको असतात. तूच मला सांग, अनवाणी पायाने चालल्यास पायांना जखमा होतील हे काय सॉक्रेटिसला माहिती नसेल? अनवाणी पायाने चालल्यास पायाला जखमा होतील हे सॉक्रेटिसला माहित असले तरीसुद्धा आपल्या आजूबाजूला अशी काही माणसे असतात जी अनवाणी पायाने चालायला निघतात कारण त्यांना येणाऱ्या पिढ्यांना हे रस्ते माहीत व्हावेत, असे वाटत असते. नितीन, माणसाचं आयुष्य सुखी करण्यात राजकारण्यांपेक्षा ही विचारी माणसे आणि साहित्यिक यांचे योगदान मोठ्या प्रमाणात असते, सामान्य माणूस आपल्या जगण्याच्या संघर्षातून जग घडवत असतो. म्हणून स्वतंत्रता हा विचार फार महत्त्वाचा आहे. कोणा एकाच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आपण समता निर्माण करू शकत नाही. आपल्याला समता प्रस्थापित करायची झाल्यास आपल्याला स्वातंत्र्याला अधिक महत्त्व द्यावे लागेल .असे अमर हबीब सांगतात.
आज शेतकरी आत्महत्या देशासमोरील मोठी गंभीर समस्या आहे. आपल्या देशात रोज 43 शेतकरी आत्महत्या करतात आणि कोणताही पक्ष यावर बोलायला तयार नाही. दर अर्ध्या तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. माणूस म्हणून जगताना मला शेतकरी आत्महत्यांची मालिका अस्वस्थ करणारी आहे. म्हणून आपला देश उभा करायचा असेल, शेतकरी सुखी करायचा असेल, तर सर्वात आधी शेतकऱयांना स्वातंत्र्य द्यावे लागेल. शेतकऱ्यांना शेतात काय पिकवावे? किती पिकवावे? कोठे विकावे? कोणत्या भावात विकावे? याचे स्वातंत्र्य नाही. त्याला ते मिळायला हवं म्हणून आपल्याला ‘शेतकरीविरोधी कायदे’ रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या कायद्यांच्या बेड्या शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास आहे. हे दूर करायचे असतील तर शेतकऱ्यांच्या मुलांनी आता शेतकरी स्वतंत्र्याचा लढा लढायचा आहे. मी शेतकऱयांच्या मुला-मुलींना किसानपुत्र म्हणतो. हे किसानपुत्र शहरात राहतात. त्यांनी आता शेतकऱ्यांचा आवाज देशातल्या शहरात बुलंद करायला हवा. यासाठी आपल्याला किसानपुत्रांची आंदोलन चालवावे लागेल.
“विचार करणाऱ्या, त्या विचारावर पुढे जाणाऱ्या स्वयंप्रकाशित सूर्यांची आवश्यकता आहे. मला सहकाऱ्याची गरज आहे अनुयायांची नाही. किंबहुना ते मला नकोच आहेत.’ अमर हबीब यांच्या या विधानाने मला आकर्षित केले. ज्या काळात सगळे नेते आपले अनुयायी गोळा करण्यात व्यस्त आहे तेंव्हा हा माणूस स्वयंप्रकाशित होण्याचा सल्ला देतो हे मला विशेष वाटते..
@ नितीन. 8329248039