5 विधान सभांच्या निकालांनी गदगद झालेले आणि बदाबदा पडलेले आता नव्या उत्साहाने शेतकऱयांच्या बाजूने गळा काढू लागले आहेत. शेतकऱयांच्या नावाने आपण किती जोरात ओरडतो याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यांच्या विलापात शेतकरी प्रश्नाचे अज्ञान खच्चून भरले आहेत. त्यांना शेतकऱयांच्या प्रशनाच्या अभ्यासपूर्ण उत्तरात रस नाही. सत्तेच्या खुर्ची पर्यंत पोचण्यासाठी त्यांना शेतकऱयांची पायरी करायची आहे. शेतकऱयांना नोकरशाहीच्या दावणीला बांधणे शेतकऱयांच्या हिताचे नाही असे म्हटले तर ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. मरणाच्या दारात असलेल्या शेतकऱ्याना वाचवण्याची तळमळ नाही. ज्यांनी गरीबी हटाव म्हणून फसवले, हिंदू म्हणून फसवले, जाती जातीच्या नावाने फसवले, तेच आता शेतकरी म्हणून फसवायला निघाले आहेत.
असे लोक ओळखायचे एकच थर्मामिटर आहे. ते म्हणजे शेतकरी विरोधी कायदे. तुम्ही शेतजमिनीवरील सिलिंगचे समर्थक आहात की विरोधक? आवश्यक वस्तू कायदा रद्द झाला पाहिजे का नाही? सरकारने खाजगी उद्योग व्यवसायासाठी सरकारी जमीन अधिग्रहण केले पाहिजे की नाही? हे प्रश्न नीर-क्षीर करतील! बेगडी सहानुभूतीदारांना उघडे पाडतील. गळा काढू प्रत्येकाला किसानपुत्रांनी हे प्रश्न विचारले पाहिजेत. किसानपुत्रांची ही ऐतिहासिक जबाबदारी आहे.
निवडणुका जवळ आल्या आहेत. गिधाडे घिरट्या घालू लागली आहेत. आपल्या कुटुंबियांना फसवणुकी पासून वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. कितीही लोभस बोलला तरी जर तो पिंजऱ्याचे दार उघडणारा नसेल तर तो आपला नाही. गळे काढू पक्ष-नेत्यांपासून सावध राहा.
अमर हबीब, किसानपुत्र आंदोलन
8411909909,