सरकारला जबाबदार धरणाऱ्या शेतकरी आत्महत्या ‘अपात्र’
यवतमाळ जिल्ह्यातील कुटुंबे दिलाशापासून वंचित
‘मोदी सरकार कर्जासाठी आत्महत्या’ असे सागाच्या पानावर चुन्याने लिहून यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील टिटवीच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना सुरुवातीला ‘शेतकरी आत्महत्या’ म्हणून मदतीस पात्र ठरविण्यात आले. नंतर मात्र अहवालात बदल करीत हे प्रकरण अपात्र ठरविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. उमरखेड तालुक्यातील सावळेश्वरच्या माधव रावते यांनी सरण रचून आत्महत्या केली. हे गाव पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दत्तक योजनेतील होते. या शेतकऱ्याला सुरुवातीपासूनच अपात्र ठरविले गेले.
ऐन हंगामात शेतावरील कामे सोडून कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी ताटकळत राहावे लागत असल्याच्या व्यथेतून टिटवी येथील प्रकाश मानगावकर या शेतकऱ्याने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी खिशातील तंबाखूच्या डबीतील चुन्याच्या सहाय्याने सागाच्या एका पानावर ‘मोदी सरकार’ तर दुसऱ्या पानावर ‘कर्जासाठी आत्महत्या’ असे लिहून ठेवले. सरकारला दोषी ठरवत शेतकऱ्याने आत्महत्या करण्याच्या मालिकेतील ही एक आत्महत्या होती. प्रकाश यांच्यावर १ लाख २४ हजार पीक कर्ज थकीत होते. शेतीतून भागत नसल्याने त्यांनी महेंद्र जितो फायनान्सकडून २ लाख ७४ हजारांचे मालवाहू वाहन व घर बांधण्यासाठी कर्ज घेतले.
प्रकाश यांना २०१५-१६ आणि २०१७-१८ या वर्षांत नापिकी झाल्याचा अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिला. आत्महत्येच्या घटनेनंतर तालुका समितीने २६ सप्टेंबर २०१७ रोजी संयुक्त अहवाल सादर करीत हे प्रकरण मदतीस पात्र असल्याचे सांगितले. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी तहसीलदारांच्या अभिप्रायास सहमत असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यानंतर महिनाभरात या समितीने स्वत:चा अहवाल बदलून पीक कर्जाव्यतिरिक्त प्रकाश यांच्यावर वाहन आणि गृह कर्ज असल्याने ही ‘शेतकरी आत्महत्या’ ठरत नसल्याचे म्हटले. प्रकाश हे शेती करीत नसल्याचेही कारण पुढे करण्यात आले. आधीच्या कुठल्याही अहवालात यासंबंधीचा साधा उल्लेख नव्हता.
जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार एक लाखाची मदत दिली. आत्महत्या अपात्र कशी ठरली, असे त्यांना विचारले. त्यांनी पीककर्ज नसल्याने अपात्र ठरल्याचे सांगितले. अडीच एकरावर कर्ज असून कर्जमाफी मिळावी यासाठी सरकारकडे अर्ज केला आहे. आत्महत्येपूर्वी ‘मोदी सरकार’ असे लिहिल्याने आज आमच्यावर हा अन्याय सुरू आहे. कायद्यानुसार एखादा व्यक्ती मृत्यूपूर्वी जे काही बोलतो किंवा लिहितो ते ग्राह्य धरले जाते. मग माझ्या पतीने कर्जासाठी आत्महत्या असे स्पष्ट लिहिल्यानंतरही त्याची दखल का घेतली जात नाही?
विद्या मानगावकर, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी
पात्र ते अपात्रतेचा प्रवास…
२५ सप्टेंबर २०१७ : तालुका समितीचा संयुक्त अहवालात पात्र
२६ सप्टेंबर २०१७ : उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार पात्र
२४ ऑक्टोबर २०१७ : तालुका समितीचा संयुक्त अहवाल अपात्र ठरविणारा
जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात काय?
‘पारवा पोलिस स्टेशनने मृतकाच्या पत्नीने दिलेल्या बयाणात प्रकाश यांना अपघात होऊन कंबर व पायाला फ्रॅक्चर झाले. दीड वर्षे पडून होते. दोन महिन्यांपूर्वी पांढरकवड्यावरून येताना डुक्कर आडवा आल्याने दुचाकीवरून पडल्याने त्यांना अपघात झाला. सायंकाळी मालवाहू गाडी रस्त्याच्या बाजूला फसून नुकसान झाल्याने त्याला दुरुस्तीसाठी खर्च येत असल्याने निराशेतून त्यांनी आत्महत्या केली. माझ्या पतीवर वाहन, गृह आणि शेतीचे कर्ज होते. अडीच एकर शेती पाच लाख ५५ हजारांना विकली. उर्वरित अडीच एकर मक्त्याने दिली. यावरून मृतक शेती करीत नव्हते. त्यांच्यामागे कर्जाचा तगादा नव्हता. सदर आत्महत्या शेतीविषयक कारणामुळे न झाल्याने अपात्र ठरते’ असे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद आहे. पोलिसांच्या बयाणाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला.
अधिकाऱ्यांच्या अहवालात बयाणांचा बनाव!
उमरखेड तालुक्यातील सावळेश्वरच्या माधव रावते यांनी सरण रचून आत्महत्या केली. रावते यांच्या पत्नी आणि मुलाने ‘कशामुळे जाळून घेतले हे आम्हाला काहीही माहिती नाही’ असे स्पष्ट केले. प्रशासनाने मात्र हेच बयाण बिडी पेटवित असताना अचानक विस्तवाची ठिणगी पडल्याने ही घटना घडल्याचे दाखविले. पात्र असूनही अपात्रतेची खेळी खेळून शेतकरी आत्महत्यांमधील आकडा घटविण्याचा प्रयत्न केला. सावळेश्वर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दत्तक गाव आहे.
माधव रावते यांच्याकडे १.४१हेक्टर जमीन होती. सोयाबीन, कापूस आणि तुरीची लागवड केली होती. हंगामाच्या सोयीसाठी त्यांनी ६० हजार रुपयांचे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ढाणकी शाखेतून कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत असल्याने त्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केला. सरकारी मर्यादेच्या आत कर्ज असल्याने पूर्ण माफी मिळणे आवश्यक असताना त्यांच्या खात्यावर २१७४ रुपये शिल्लक दाखविण्यात आली. मागील तीन वर्षांपासून नापिकीने रावते संकटात सापडले होते. या विवंचनेतूनच त्यांनी १४ एप्रिल रोजी सरण रचून आपल्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावला. या घटनेनंतर ही शेतकरी आत्महत्या नसल्याचे दाखविण्यासाठी प्रशासनाने आटापिटा केला. सुमारे २५ दिवसानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीचा अहवाल दिला. मृतकाच्या नातेवाइकांच्या जबाबावरून ‘मृतक हा बिडी पटवित असताना अचानक विस्तवाची ठिणगी पडल्याने पऱ्हाट्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. या आगीमध्ये जळून मरण पावला’ तर ग्रामस्तरीय समितीच्या अहवालात ‘मृतक हा वयोवृद्ध असल्यामुळे त्याला व्यवस्थित दिसत नव्हते. शेतामध्ये काडीकचरा पेटविताना तोला गेला आणि जळून मृत्यू झाला’ असे नमूद असल्याचे म्हटले आहे. सदर प्रकार शेतकरी आत्महत्येत बसत नसल्याने आर्थिक मदतीस पात्र ठरत नसल्याचे म्हटले. या अहवालावर उमरखेडचे तालुका कृषी अधिकारी, बिटरगावचे ठाणेदार व तहसीलदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुळात रावते यांनी आत्महत्या केली असताना कुणीही शेतावर नव्हते. त्याची पत्नी आणि मुलाने तसे आपल्या बयाणात स्पष्ट केल्याचे अहवाल सांगते. आत्महत्येचे नेमके कारण किंवा घटना माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतरही त्यांच्या बयाणाचा बनाव रचण्यात आला. आत्महत्येपूर्वी त्यांची चप्पल, चष्मा व साहित्य एका झाडाखाली बाजूला काढून ठेवले होते, असे गावकरी सांगतात. रोज शेतात जात, बँकेतही जात असताना त्यांना दिसत नव्हते असे सांगण्यात आले. कृषी अधिकाऱ्यांनी मागील वर्षी नापिकी झाल्याचे मान्य केले आहे. तरीही कर्जबाजारी, नापिकी अशा कुठल्याही कारणामुळे झाली नसल्याचा निष्कर्षही मांडण्यात आला आहे.
– विनोद वाघमारे
vinod.waghamare@timesgroup.com