या विषयीची ही प्रश्नोत्तरे …
किसानपुत्र आंदोलन ही संघटना आहे का?
किसानपुत्र आंदोलन संघटना नाही. यात कोणी अध्यक्ष, सचिव किंवा कोषाध्यक्ष नाही. आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. कोणीही व्यक्ती या आंदोलनात सहभागी होऊ शकते. आम्ही निधी गोळा करीत नाही. गरजेच्या वेळी किसानपुत्रानी गरजे पुरता खर्च करायचा. ही आमची कार्य पद्धती आहे.
हे आंदोलन कशासाठी आहे?
हे आंदोलन ‘शेतकरी विरोधी कायदे’ संपवण्यासाठी आहे.
कोणते कायदे शेतकरी विरोधी आहेत?
तसे पाहिले तर शेकडो कायदे शेतकरी विरोधी आहेत. पण जे तीन कायदे शेतकर्यांचा गळफास बनले आहेत, ज्या तीन कायद्यांनी शेतकरी लुटण्याची व्यवस्था निर्माण केली आहे, त्यावर आपण लक्ष केंद्रीत केले आहे. हे तीन कायदे पुढील प्रमाणे आहेत.
1) कमाल शेतजमीन धारणा कायदा (सीलिंग)
2) आवश्यक वस्तू कायदा 1955
3) जमीन अधिग्रहण कायदा
आंदोलन करायचे म्हणजे काय करायचे?
उपोषण करणे, मोर्चा काढणे,धारणा धरणे, रस्ता रोको करणे, बंद पुकारणे, गर्दी गोळा करणे ही पद्धत आज तेवढी परिणामकारक राहिली नाही. म्हणून आपल्याला नवे मार्ग शोधावे लागतील.
लोकांना मूर्ख बनवून ज्यांना पुढारी व्हायचे असते ते गर्दी जमवतात. हे काम सता परिवर्तना पुरते नसून व्यवस्था परिवर्तनाचे असल्यामूळे येथे संख्ये पेक्षा शक्कल महत्वाची ठरणार आहे.
किसानपुत्र आंदोलन शांततामय मार्गाने चालेल.
किसानपुत्र आंदोलनाने आतापर्यंत काय केले?
2015 पासुन आम्ही कामाला लागलो. सुरुवातीला ‘कायदे शेतकरी विरोधी असू शकतात’ हेच लोक मान्य करायला तयार नव्हते. म्हणून आम्ही हा विषय घेउन महाराष्ट्रभर फिरलो. पुस्तिका काढली, कायदे परिषदा घेतल्या. शिबिरे घेतली, सोशल मिडियावर प्रचार केला. यात अनेक किसानपुत्र या आंदोलनाला जोडल्या गेले. आपापल्या परिने त्यानी योगदान दिले. मकरंद डोईजड या किसानपुत्राने घटनेच्या अनुच्छेद 31बी ला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या अनुच्छेदामुळे घटनेत परिशिष्ट 9 आले. या परिशिश्टात हे कायदे समाविष्ट केल्यामुळे त्यांना आव्हान देता आले नाही. म्हणून ते टिकून राहिले. मकरंदने मुळावर घाव घातला. आता आम्ही आवश्यक वस्तू कायद्याच्या विरोधात न्यायालयात जायची तयारी करीत आहोत.
फक्त न्यायालयीन लढाई लढण्याचे काम किसानपुत्र आंदोलन करते काय?
नाही. आमच्या पाच आघाड्या आहेत. न्यायालयीन आघाडी, संसदीय आघाडी, जनआंदोलन आघाडी, प्रचार-प्रसार आघाडी आणि राष्ट्रिय आघाडी, 19 मार्च रोजी ‘अन्नदात्त्यासाठी अन्नत्याग’ असा उपवास केला जातो. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांसाठी सहवेदना व्यक्त केली जाते. शेतकरीविरोधी कायदे रद्द करून घेण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची आमची तयारी आहे.
तुमचा कोणत्या राजकिय पक्षाशी संबंध आहे?
कोणत्याही राजकिय पक्षाशी या आंदोलनाचा संबंध नाही. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी जो पुढे येईल त्याला किसानपुत्र साथ देतील.
किसानपुत्र आंदोलन कोणती विचारसरणी मानते?
काळ बदलला की परिस्थिती बदलते. बदललेल्या परिस्थितीत समस्येचे स्वरूपही बदलते म्हणून कोण्या विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करण्यापेक्षा परिस्थितीचे आकलन करून उत्तर शोधणे हा मार्ग आम्हाला योग्य वाटतो.
आम्ही शेतकर्यांच्या स्वातंत्र्याच्या बाजूचे आहोत. वर्ग संघर्ष किंवा वर्ण संघर्ष या पेक्षा आम्हाला सर्जकांच्या स्वातंत्र्याचा संघर्ष तर्कसंगत वाटतो.
आम्ही सरकारने निर्माण केलेले अडथळे दूर करा म्हणतो.
किसानपुत्र आंदोलनात कोणाला सहभागी होता येईल?
तुम्ही तिक्डे काय करता याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही. जो कोणी शेतकरी विरोधी कायदे रद्द करायला काम करेल तो या आंदोलनात आहे असे आम्ही मानतो.
हे काम एवढे मह्त्वाचे का आहे?
होय, प्रत्येक पिढीचे एक काम असते. मागच्या पिढ्यांनी त्यांची कामे केली. आपल्या पिढीचे काम ‘शेतकरी विरोधी कायदे’ संपवणे हे आहे. ही आपली जबाबदारी आहे. ती आपल्याला पार पाडावीच लागेल.
शेतकरी विरोधी कायद्यांवर एक घाव माझा, एक घाव तुमचा!
– अमर हबीब,
किसानपुत्र आंदोलन
8411909909