#StopKillingFarmers
“साहेबराव पाटील टू धर्मा पाटील व्हाया कँपीटँलीसम….” ( रिलोडेड )
“साहेबराव पाटील..”
किसानपूत्र म्हणून जन्मलेला…
शिकेल-सवरेल साहेबराव….
तीन दशकांअगोदर चिरनिद्रेत गेला होता…
व्यवस्थेला दंडवत घालून…
तो नेता नव्हता..
तो अभिनेता नव्हता..
तो क्रिकेटर नव्हता..
तो उद्योगपतीही नव्हता…
कोणी तो मेला
याची हळहळ व्यक्त करायला…
एका बापाने आपल्या पोटच्या गोळ्यांना
भज्यातून ‘झिंक फॉस्फेट’ चारले
आणि स्वतःही मेला…
ह्या अशा सहिष्णू देशात
पुन्हा जन्म न घेण्यासाठी…
वडीलांकडून संगीताचे
शिक्षण घेतलेले साहेबराव…
त्यांची संसारमैफल
सुरेल करण्यात अपयशी ठरला….
कर्जाच्या, व्यवस्थेच्या सावकारांच्या बेसूरेपणामूळे…
त्याच्यावर असलेल्या कर्जाचा
चक्रवाढी गुणाकार होत गेला…
आणि…
साहेबरावांनी
आपल्या आयुष्याचा भागाकार केला…
तोही व्याजासकट…
चार मूले, पत्नी आणि स्वतःला संपवून…..
आजही
साहेबरावांच्या सरणावरची आग विझली नाही…
त्यानंतर आजपर्यंत जवळपास
‘तीन लाख साहेबराव’ व्यवस्थेने संपवले…
शेतकरी विरोधी कायद्यांच्या बेड्या ठोकून…
तीन लाख साहेबराव संपले…
पण,
आम्ही माञ ढिम्म…
निर्धास्तपणे जगतोय…
आमच्या सो-कॉल्ड शहरीपणाचा,
शिक्षणाचा बडेजाव करत…
मॉलमध्ये शॉपींग करून
रस्त्यावर स्वस्त
भाजीपाल्याची मागणी करत…
असे अनेक साहेबराव संपवण्यासाठी….
पणss…
एक प्रश्न मनाला
अजूनही अनुत्तरीत आहे…
शेतीमातीमध्ये प्राणपणाने लढणाऱ्या…
लेकरांसाठी अस्मानी संकटांशी झगडणाऱ्या..
दुनीयादारीच्या कैफात पिसलेल्या…
तीन लाख साहेबरावांची
आत्महत्या की हत्या?….
***…
“धर्मा पाटील…”
विषाची परिक्षा घेणे
चालूच आहे रोज….
आता अमुच्या अंगणात
तुळस नाही….
विषवल्ली उगवते….
भांडवलदारी शोषणाची…
आधी पाखरे येऊन
खेळायची…
कल्लोळ करायची…
नाचायची…बागडायची…
हल्ली फक्त गिधाडं येतात….
ते येतात….बघतात…
सर्वेक्षण करतात…..
हातावर ठेवतात
कागदाचे गठ्ठे….
सोनं उगवणाऱ्या
जमिनीचा मोबदला म्हणून….
थाटतात त्यांचा
डौलदार कारखाना…
आमच्या नासूर जखमांना तुडवून….
वेळेवर उपचार न झालेल्या
जखमेसारखी
आमची मनं झाली हल्ली…
आधाराच्या अपुऱ्या अॉक्सिजनअभावी
जीव गुदमरतो…
शासन दरबाराचे
उंबरठे झीजवत
पाय घासून आम्ही मरतो…
शासनाच्या पूर्वनियोजीत कटाचे
बळी आम्ही ठरतो….
आणि
सुशिक्षित लोकं त्याला
‘शेतकरी आत्महत्या म्हणतात…’
–वैभव भिवरकर
कारंजा लाड जि. वाशिम
मो. ९४२२७८५७०७